Thursday 25 August 2016

भारतीय क्रिकेटमध्ये गुलाबी चेंडूच्या पर्वाची सुरुवात

सुरुवातीला लाल चेंडू नंतर पांढरा चेंडू आणि आता गुलाबी चेंडू. सर्वोत्तम क्रिकेट म्हटले की कसोटी क्रिकेटच अग्रस्थानी राहणार परंतु सध्याच्या वाढत्या टि-२० व एकदिवसीय सामन्यांमुळे नवोदित खेळाडुंचे कसोटी क्रिकेटकडे दुर्लक्ष होते. खेळाडंचा गैरसमज होतो की जेव्हा एखादा खेळाडू टि-२० व मर्यादित षटकांच्या सामन्यात यशस्वी ठरला की तो यशस्वी खेळाडू म्हणून गणला जाईल. परंतु इतिहास पाहिला तर ज्याप्रकारे सचिन तेंडुलकर, राहुल द्रविड, कुमार संगकारा, माहेला जयवर्धने, जॅक कॅलिस कसोटी क्रिकेट व एकदिवसीय क्रिकेटमध्ये यशस्वी झाले तितकेच ते टि-२० मध्ये यशस्वी झाले.आजच्या घडीला जर व्हिव रीचर्डस, कपिल देव, इम्रान खान, वासीम अक्रम खेळत असते तर त्यांनी टि-२० मध्ये आपला दबदबा निर्माण केला असता यात शंका नाही.
कसोटी क्रिकेट म्हणजे सभ्य माणसांचा खेळ ते पांढऱ्या पोशाखाने दिसुनच येते. जसा बदल प्रत्येकाच्या आयुष्यात महत्त्वाचा असतो त्याच प्रकारे काळानुसार क्रिकेटमध्ये अनेक बदल घडुन आले जसे फ्रि हीट, धावक फलंदाजाच्या छाती व डोक्यावरुन उसळी घेत जाणाऱ्या चेंडूची संख्या, तीसरे पंच. एकदिवसीय क्रिकेटमध्ये लाल चेडू ऐवजी पांढरा चेंडू वापरला जाऊ लागला आणि पांढऱ्या शुभ्र कपड्यांची जागा रंगीत कपड्यांनी घेतली. आधी ६० षटकांचा खेळला जाणारा एकदिवसीय सामना आता ५० षटकांचा खेळला जातो.
प्रेक्षकांना कसोटी क्रिकेटकडे आकर्षित करण्यासाठी आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने एकदिवसीय सामन्यांप्रमाणेच कसोटी सामने दिवस रात्र खेळवण्यास सुरुवात झाली ती ऑस्ट्रेलिया-न्युझिलंड सामन्याने. गुलाबी चेडूचा वापर सुरु झाला आणि क्रिकेटमध्ये एका नव्या पर्वाला सुरुवात झाली. त्याच धर्तीवर बीसीसीआयने २०१६ ची दुलिप ट्रॉफी गुलाबी चेंडुच्या सहाय्याने दिवस रात्र खेळवण्यास सुरुवात झाली. या आधी प.बंगाल मध्ये क्लब क्रिकेटमध्ये एका सामन्यात गुलाबी चेंडूचा वापर करण्यात आला पण पहिल्यांदाच संपुर्ण स्पर्धेत गुलाबी चेंडू वापरला जाणार आहे यामुळे फलंदाजा बरोबरच गोलंदाजाला समान संधी मिळणार आहे. निश्चितच याचा फायदा कसोटी क्रिकेटबद्दल आकर्षण निर्माण करण्यासाठी तसेच कसोटी क्रिकेटचे स्थान टिकवण्यात होईल.

शंतनु कुलकर्णी

No comments:

Post a Comment