Sunday 31 July 2016

जिम लेकर


एकदिवसीय क्रिकेट तसेच टि-२० क्रिकेटमध्ये ज्याप्रकारे फलंदाज महत्त्वाची भुमिका निभावतो त्याच वेळेस कसोटीचा विचार करता गोलंदाजाची कामगिरी महत्त्वाची ठरते. कारण सामन्यात २० फलंदाज बाद करुन संघाला विजय प्राप्त करुन देतो. फलंदाजाची शतकी खेळी आणि गोलंदाजाच्या ५ विकेट दोघांची कामगिरी समान मानली जाते.१३९ वर्षांच्या क्रिकेट इतिहासात अनेक दर्जेदार गोलंदाजांनी आपल्या कामगिरीने आपले नाव सुवर्ण अक्षरात लिहिले मग त्यात कसोटी इतिहासात पहिल्यांदा ५०० बळींचा टप्पा पार पाडणारा वेस्ट इंडिजचा कर्टनी वॉल्श असो वा ८०० बळींचा टप्पा पार पाडणारा श्रीलंकेचा फिरकी गोलंदाज मुथय्या मुरलीधरन यांनी युवा गोलंदाजांसाठी एक लक्ष्य निर्माण करुन ठेवले आहे. त्याचप्रमाणे इंग्लंडच्या जिम लेकर यांनी एका सामन्यात सर्वाधिक गडी बाद करण्याचा विक्रम  आपल्या नावे केला आहे.
पण इतक्या वर्षांच्या क्रिकेट इतिहासात एका डावात दहा बळी बाद करण्यात फक्त दोन गोलंदाजांना यश आले. त्यातील पहिले होेते इंग्लंडचे फिरकी गोलंदाज जिम लेकर आणि सध्याचे भारतीय संघाचे प्रशिक्षक अनिल कुंबळे यांना. ३१ जुलै १९५६ साली आेल्ड ट्रॅफर्डच्या मैदानावर अॅशेस मालिकेतील तिसऱ्या कसोटी सामन्यात जिम लेकर यांनी ही कामगिरी केली. या  सामन्यातील दुसऱ्या डावात त्यानी  धावात 10 गडी बाद केले. त्यांच्या गोलंदाजीचे पुथ:करण ५१.२-२३-५३-१० असे होते तर सामन्यात ९० धावांत १९ गडी बाद केले. याच अॅशेस मालिकेत त्यांनी तब्बल ४६ गडी बाद केले आणि इंग्लंडला २-१ ने मालिका विजय प्राप्त करुन दिला.
जिम लेकर यांनी कसोटी कारकिर्दीत ४६ सामन्यात १९३ गडी बाद केले तर प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये ४५० सामन्यात त्यांनी तब्बल १९४४ गडी बाद केले. २३ ऑगस्ट २००९ साली जिम लेकर यांचा आयसीसीच्या हॉल ऑफ फेम मध्ये समावेश करण्यात आला.

शंतनु कुलकर्णी



No comments:

Post a Comment